अनंत चतुर्दर्शीचे व्रत का करतात ? जाणून घ्या पूजाविधी, महत्व आणि मान्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजन, गणेश चतुर्थी, राधाष्टमी, परिवर्तिनी एकादशी, वामन द्वादशी साजरी केल्यावर भाद्रपद चतुर्थीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. या दिवशी अनंत म्हणजे श्रीविष्णूची पूजा करतात. त्यामुळे या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करुन हे व्रत पूर्ण केले जातात. तसेच या व्रताचरणात श्रीविष्णुसह शेषनागाचे पूजन केले जाते.

महाराष्ट्रात गणेशोत्सव दहा दिवस साजरा करण्यात येतो. त्यामुळे दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला केली जाऊ लागली. म्हणून अनंत चतुर्दशी स्थितीला वेगळे महत्व प्राप्त झाले. तर आज आपण अनंत चतुर्दशीच्या व्रत कसे करायचे, अनंत व्रताचा उद्देश, पद्धती याबाबत जाणून घेणार आहोत.

श्री अनंत व्रत

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जातात. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरुपी शक्ती. हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णुंना अनुसरून केले जाते. या व्रतात शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात, अशी मान्यता आहे. १ सप्टेंबर २०२० रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्या दिवशी हे व्रत आचरावे, असे म्हटलं जातं.

पद्धत

अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजे श्रीविष्णू असून, शेषनाग आणि यमुना या इतर देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा आहे. या व्रताची सुरुवात अनंताचा दोरा सापडल्यास अथवा कोणी सांगितल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सुरु होते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते, असे सांगतात.

स्वरुप

चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात. त्यावरती पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात. त्यावरती सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेषनाग ठेवून त्याच्यापुढे हळदीने रंगविलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात. कुंभाला वस्त्राने वेष्टन करतात. कुंभातील पाण्याला यमुना मानले जाते. शेष व यमुना यांची पूजा केल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात. अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा यात समावेश केला जातो. पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात. प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातावर किंवा गळ्यात बांधला जातो. वडे आणि घार्गे यांचे देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन केले जाते. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी, असा संकेत मानला जातो.

महत्व

अनंत व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतनस्वरूप क्रियाशक्ती विष्णुरूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस. त्यादिवशी विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात, असे मानले जाते. शेषदेवता विष्णुतत्त्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचा उत्तम वाहक मानली जाते. त्यामुळे शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलं आहे. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरुपी देवतेच्या पूजाविधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते, असे सांगितले जाते.

दोऱ्याचे महत्व

मानवाच्या देहात १४ ग्रंथी असतात. या ग्रंथीचे प्रतीक म्हणून दोऱ्याला १४ गाठी असतात. विशिष्ट देवांना या गाठींवर आवाहन करण्यात येते. १४ गाठींच्या दोऱ्याची मंत्राच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा केली जाते. त्यामुळे चेतनेच्या प्रवाहास गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास साहाय्य प्राप्त होते. नंतर पुन्हा पुढील वर्षी जुने दोरे विसर्जित करुन क्रियाशक्तीचे प्रभारित नवीन दोरे बांधले जातात. द्युत क्रीडेत गमावलेला सर्व वैभव परत मिळण्यासाठी युद्धिष्ठिरासह पांडवांनी अनंत व्रताचे आचरण केलेलं. श्रीकृष्णाने पांडवांना या व्रताचे महत्व सांगितलेलं. त्या व्रतप्रभावाने पांडवांना त्यांचे गेलेलं राज्य परत मिळाले. गतवैभव प्राप्त झाल्याची आख्यायिका आहे.