उच्चशिक्षित दाम्पत्याने केली 2 मुलींची हत्या, मृतदेहाशेजारीच नाचत होती आई, अटकेनंतर म्हणाली – ‘मीच मानवरुपातील कोरोना’

पोलीसनामा ऑनलाईन – एका उच्चशिक्षित दाम्पत्याने त्यांच्या दोन तरुण मुलींची हत्या केली. हत्येनंतर मुलीची आई मृतदेहाशेजारीच नाचत, गात होती. आंध्र प्रदेशातील मदनापल्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक आणि विचित्र घटना घडली आहे. मुलींना ठार मारल्यानंतर दोघेही आत्महत्या करणार होते. पुनर्जन्मासाठी त्यांनी हे अघोरी कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलींच्या आई-वडिलांना अटक केली आहे.

पद्मजा नायडू आणि डॉ. व्ही. पुरुषोत्तम नायडू अशी अटक केलेल्या आई वडिलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम आणि पद्मजा या दोघांनी मिळून रविवारी (दि. 24) त्यांच्या दोन्ही मुलींचा त्रिशूळ आणि डंबेलने मारून निर्घूणपणे खून केला. मोठी मुलगी अलेखा ही 27 वर्षाची होती, तर लहान साई दिव्या ही 22 वर्षाची होती. हत्याप्रकरण उघडकीस आल्यानंतर जेंव्हा पोलीस या नायडू दाम्पत्यांच्या घरात पोहचले तेंव्हा पद्मजा ही मृतदेहाशेजारी जोरजोरात नाचत होती आणि सोबत गातही होती. कोरोना विषाणू चीनमधून जगात पसरला नसून ते देवाची करणी आहे. कलियुगातही वाईट गोष्टीचा नाश करण्यासाठी देवाने कोरोना तयार केल्याचे ती बडबडत होती. पोलिसांनी जेंव्हा तीला कोरोना चाचणीसाठी नेले. तेंव्हा त्याठिकाणी तिने प्रचंड गोंधळ घातला. चाचणीसाठी नकार देत मानवरुपातील मीच कोरोना असल्याचे म्हणत आरडाओरडा केला.

मुलीचे वडिल वेल्लारु पुरुषोत्तम हे रसायनशास्त्रातील पीएचडीधारक असून ते शासकीय महिला महाविद्यालायात अध्यापनाचे काम करतात. तर मुलींची आई पद्मजा ही उच्चशिक्षित असून तिने गणितात सुवर्णपदक मिळवले आहे. ती गेल्या 23 वर्षापासून एका शिक्षण संस्थेत शिकवण्याचे काम करत होती. अटक केलेल्या नायडू दाम्पत्याची तिरुपती येथील एसव्हीआरआर मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या कक्षेत रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान हत्येच्या 3 दिवस आधी अलेख्याने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने म्हटले होते की भगवान शिव येत आहेत. जगाचा अंत जवळ आला आहे. यावरून या मुली या अघोरी प्रकरणात सामील असाव्यात, किंवा त्यांना ठार मारण्यात येणार असल्याची कल्पना आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.