धक्कादायक ! जेवणावरून वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानं वडिलांनाच भोसकलं

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जेवणावरून झालेल्या वादामुळं वडिलांनी मुलाला मारलं. परंतु याच रागातून मुलानं वडिलांचा कात्रीनं भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उचगावमधील मणेरमाळ परिसरातील इंद्रजीत कॉलनीत दुपारी ही घटना घडली. चंद्रकांत सोनुले (वय 48) असं खून झालेल्या वडिलांचं नाव आहे. ज्ञानेश्वर सोनुले (वय 22) असं आरोपी मुलाचं नाव आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या मणेरमाळ परिसरातील इंद्रजीत कॉलनीत चंद्रकांत भगवान सोनुले आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात रहात होते. चंद्रकांत पेंटर म्हणून काम करत होते. मुलगा ज्ञानेश्वर हा काहीच कामधंदा करत नव्हता. रविवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास बापलेक जेवायला बसले होते. जेवण करताना बापलेकात वाद झाला. पहाता पहाता दोघांमधील वाद हा विकोपाला गेला. वडिल चंद्रकांत यांनी ज्ञानेश्वरला तांब्या फेकून मारला. राग अनावर झाल्यानं संतापलेल्या ज्ञानेश्वरनं शेजारी पडलेली कात्री घेतली आणि वडिलांच्या छातीत भोसकली. नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकांत यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच करवीर डीवायएसपी प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन पुढील कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वरला अटक केली.