काही IPS अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचं वृत्त निराधार, माझ्या तोंडी ते वक्तव्य टाकण्यात आलं : गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचं वृत्त निराधार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. मी असं काहीही बोललेलो नाही, माझ्या तोंडी ते वक्तव्य टाकण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. पुण्यात आज पत्रकार परिषदेत अनिल देशमुख बोलत होते.

राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच प्रयत्न केले होते. तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला गेला, असे अनिल देशमुख यांनी म्हटल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला होता, असंही प्रसिद्ध झालं होतं. यावर देशमुख यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दांत हे वृत्त फेटाळून लावलं, मी असं काहीही बोललेलो नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना महाराष्ट्र पोलीस थकले, मात्र हिंमत हरले नाहीत, अशा शब्दात त्यांनी राज्यातील पोलिसांचे कौतुक केले. लॉकडाऊनच्या काळात वाधवान बंधूंना प्रवासाची परवानगी दिल्या प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. या संदर्भात विचारण्यात आले असता ते म्हणाले, अमिताभ गुप्ता यांची वाधवान प्रकरणात चौकशी झाली असून खात्याने सुचविल्या नुसार त्यांना शिक्षाही झाली आहे. असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

पोलीस खात्यातील प्रस्तावित भरती बाबत मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने साडेतेरा टक्के जागा राखून ठेवून इतर भरती करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्यात येत असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.