‘निर्भया’च्या आरोपींच्या फाशीसाठी अण्णांचे मौनव्रत, पंतप्रधानांना पाठवले पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील ‘निर्भया’च्या आरोपींना अद्याप फाशी झालेली नाही. या आरोपींना फाशी द्यावी, यासाठी 20 डिसेंबरपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत मौनव्रत धारण करणार आहेत. त्यानंतरही फाशीची अंमलबजावणी न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.

दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. देशात ‘फास्टट्रॅक कोर्टा’त लाखो प्रकरणे पडून आहेत. न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 20 डिसेंबर पासून मौन धारण करणार आहेत. सरकारने तातडीने पावले न उचळल्यास बेमुदत उपोषण आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून देशात वाढते महिला अत्याचार आणि हत्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात न्यायाला आणि प्रत्यक्ष शिक्षेला होणाऱ्या अक्षम्य विलंबाबाबत नाराजी स्पष्ट केली आहे. दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतिकुमार चौधरी बलात्कार प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैदराबाद बलात्कार प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला होणारा उशीर नवीन गुन्ह्यांना प्रोत्साहीत करणारा ठरत असल्याचे म्हटले आहे.

बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर 426 प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही. फास्टट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत, त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत.

Visit : Policenama.com