राळेगणसिद्धीचा सर्वांनी आदर्श घ्यावा : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तंत्रज्ञानाचा वापर सर्वश्रुत आहेच. यावेळेस त्यांनी थेट ‘नमो अॅप’वरुन भाजपाच्या आमदार-खासदारांशी संवाद साधला. देशातील कानाकोपऱ्यातून खासदार आणि आमदारांनी पंतप्रधानांसमोर आपले प्रश्न रविवारी मांडले.

या प्रश्नांना बोलताना पंतप्रधानांनी ग्रामविकासावर आपला भर दिला. गाव सर्व सुविधांनी युक्त असावे, त्यासाठी भाजपा नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत असे सांगताना त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावाचा उल्लेख केला. हजारेंचे आदर्श गाव राळेगणसिद्धीपासून आदर्श घेयला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. हे आदर्श उदाहरण देत त्यांनी प्रत्येक नेत्याने किमान एक गाव दत्तक घेऊन त्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचविले.  या संभाषणातून अण्णा हजारे यांच्या ग्रामविकास प्रतिकृतीला पंतप्रधानांनी पाठींबा दिल्याचे दिसते.

ट्विटरवरून बातचीत करण्यास तयार
हा संवाद अनौपचारिक असला तरी जर खासदारांच्या त्यांच्या मतदारसंघातील तीन लाखांपेक्षा अधिक लोक ट्विटरवर त्यांना फॉलो करत असतील तर करायला मी थेट त्यांच्याशी बातचीत करायला तयार आहे. तर आमदारांसाठी त्यांच्या मतदारसंघात एक ते दोन लाख लोक ट्विटर फॉलोअर असतील संवाद साधायला तयार असल्याचे मोदी म्हणाले. यासाठी निश्चित वेळ देण्यास थोडा उशीर होऊ शकतो मात्र, त्यांच्याशी थेट संवाद साधायला मला आवडेल.

नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याच्या सूचना
यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींना अनेक ‘मोदी मंत्र’ दिले. यावेळी पंतप्रधानांनी खासदार आणि आमदारांना मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचे औषधोपचार आणि तरुणांच्या रोजगारावर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या. एका खासदाराशी संवाद साधताना मोदी म्हणाले, पहिल्यांदा हृदयाच्या आजारावर उपचारासाठी लाख-दीड लाख रुपये खर्च यायचा. आता हा खर्च खूपच कमी झाला आहे. त्याचबरोबर त्यांना साफ सफाई आणि लसीकरण योजनांवर विशेष लक्ष देण्यास सांगितले.

शेतकऱ्यांसाठी हे करा
”गावातील प्रत्येक घरात एलईडी बल्ब लावण्यात यावेत. शेतकऱ्यांना सोलर पंप लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, यामुळे त्यांच्या पैशात बचत होईल. त्यांनी गावांमध्ये थेट युरिया पोहोचवण्याचाही सल्ला यावेळी मोदींनी दिला. यामुळे त्याचे येण्या जाण्याचे पैसे वाचतील. तसेच शेतकऱ्यांना पिकविमा घेण्यासाठीही प्रेरित करायला हवे,”असेही पंतप्रधान म्हणाले.