अबब ! बिलाच्या 45 % मागितली लाच; ‘स्वच्छ भारत’मध्ये भ्रष्टाचाराची ‘घाण’, 2 अधिकार्‍यांना ACB ने रंगेहाथ पकडले

मुंबई : देशातील नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, यासाठी देशभर स्वच्छ भारत उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, त्यात लाचखोर अधिकार्‍यांमुळे भ्रष्टाचाराची घाण निर्माण झाली आहे. इतके नाही तर त्याची भूक प्रचंड वाढली आहे. स्वच्छ भारत योजनेतील बिल मंजूर करण्यासाठी चक्क बिलाच्या ४५ टक्के लाच मागण्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ विभागीय लेखा अधिकारी आणि भांडारपाल यांना लाच घेताना पकडले आहे.

भांडारपाल प्रकाश लक्ष्मण परब (वय ४५) आणि वरिष्ठ विभागीय लेखा अधिकारी बीरेंद्र कुमार सिन्हा अशी दोघांची नावे आहेत. फिर्यादी हे स्वच्छ भारत/ स्वच्छ मुंबई यासाठी काम करतात. यामध्ये विविध ठिकाणी निर्माण होणार्‍या कचर्‍याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करुन ओला कचर्‍यापासून खत निर्मितीचे काम करतात.

ऑगस्ट २०१८ पासून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांद्रा येथील गर्व्हमेंट कॉलनीत प्रायोगिक तत्वावर काम चालू केलेले आहे. त्यातील एका बिलाची रक्कम त्यांना मिळालेली आहे. त्यांच्या उर्वरित बिलाची एकूण रक्कम २१ लाख ९३ हजार रुपये आहे. या बिलाची रक्कम मंजूर करवून देण्यासाठी भांडारपाल प्रकाश परब याने बिलाच्या ४५ टक्के इतक्या लाचेची मागणी केली.
त्याविरोधात फिर्यादी यांनी ११ जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी १ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या पडताळणीत प्रकाश परब याने एकूण बिलाच्या ४५ टक्के म्हणजेच ९ लाख ८६ हजार रुपयांची मागणी स्वत:साठी व वरिष्ठांसाठी केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २४ मार्च रोजी सापळ्याचे आयोजन अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी बीरेंद्र कुमार सिन्हा याने त्याच्या हिश्यांची लाचेची रक्कम प्रकाश परब याच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादीकडून स्वत: साठी व वरिष्ठांकरीता ४ लाख २५ हजार रुपये स्वीकारताना प्रकाश परब याला रंगेहाथ पकडण्यात आले.