सुरत: Anurag Kashyap | बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य अडचणीत आणणारे ठरत आहे. सुरत येथील न्यायालयाने अनुराग कश्यपला नोटीस बजावत ७ मे २०२५ रोजी न्यायालयात वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या वकिलामार्फत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जर ते अनुपस्थित राहिले, तर न्यायालय त्यांच्या विरोधात एकतर्फी कारवाई करू शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.
ही नोटीस सुरत येथील वकील कमलेश रावल यांनी २२ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे जारी करण्यात आली आहे. अनुराग कश्यपने १६ एप्रिल रोजी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे.
या वादग्रस्त पोस्टनंतर देशभरातून नाराजी व्यक्त झाल्यावर १७ एप्रिल रोजी ती पोस्ट हटवण्यात आली. त्यानंतर त्यांनी १७ आणि १९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर माफी मागणारे व्हिडिओ शेअर केले. मात्र, तक्रारदार कमलेश रावल यांनी या माफीनाम्याला अपुरा मानत, अनुरागवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.