ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – वास्तुविशारद अन्वय नाईक प्रकरणात ( Anvay Naik Suicide Case ) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक झाल्यानंतर भाजपकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार (Land Deal) झाल्याचा दावा केला आहे. यानंतर अन्वय नाईक कुटुंबीयांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यासंबंधी खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray Family) यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत( Anvay Naik Family) नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. यावरही त्यांनी भाष्य केले आहे.

सोमय्या दावा करत असलेले जमिनीचे व्यवहार झाल्याची माहिती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली आहे. ठाकरे यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. जमीन कोणी विकत का देऊ शकत नाही? हा योग्य मार्गाने झालेला व्यवहार आहे. यामध्ये किरीट सोमय्यांना आता का समस्या जाणवत आहे. त्याचा आत्महत्येच्या प्रकरणाशी काय संबंध आहे. सोमय्या नेमके काय दाखवू इच्छित आहेत ? अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे. तसेच सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रे असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रे जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते, असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला आहे. सोमय्या आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर जागे झाले आहेत, अशी टीका आज्ञा नाईक यांनी केली आहे.

आवाज बंद करण्यास वेळ लागणार नाही- अक्षता नाईक
तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी 5 मे 2108 ला जेव्हा आम्ही अग्नी दिला तेव्हा सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? अशी विचारणा केली आहे. “लोक कित्येक वस्तू विकत घेतात. या वस्तूंशी हा संबंध नाही. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. सोमय्यांनी जमिनीच्या व्यवहाराशी त्याची तुलना करू नये. एक आई आणि तिचा मुलगा गेला आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका. बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा अक्षता नाईक यांनी यावेळी किरीट सोमय्या यांना दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी काय म्हटलं होतं ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रेही सादर केली आहेत. ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 21 सातबारा उतारे आम्ही शोधून काढले आहेत. यामध्ये जमिनीचे व्यवहार झाले आहेत. जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या हा उद्धव ठाकरेंचा व्यवसाय आहे का? रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे की, ही गुंतवणूक आहे याची माहिती आम्हाला हवी आहे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.