‘गाणे म्हणणे, विधाने करणे यात रश्मी ठाकरे कधी पडल्या नाहीत’, सेनेचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून (Anvay Naik suicide case) शिवसेना (Shivsena) आणि भाजपात (BJP) शाब्दिक युद्ध पेटले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे नाईक कुटुंबांशी जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे, तर रश्मी ठाकरे यांनी कधी गाणे म्हणणे, चेहरा बदलणे, वेगवेगळी विधान करणे यात पडल्या नाही, असे म्हणत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी भाजपला जशास तसे उत्तर दिले.

विधान परिषदेच्या उपसभापती आणि सेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सेनेवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना सणसणीत उत्तर दिले आहे. मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहेत. हाच सर्वांत मोठा विनोद आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सरकार, विधिमंडळ कधीही पाठीशी घालणार नाही, असे म्हणत गोऱ्हे यांनी भाजपचे नेते राम कदम (ram-kadam) यांना सणसणीत टोला लगावला आहे.

‘किरीट सोमय्या यांनी सातत्यानं जे विषय काढले आहेत, ते जेवणातील लोणच्यासारखे आहेत. त्यांनी आतापर्यंत जेवढे आरोप केले आहेत, त्याचे एक पुस्तक होईल. त्यांनी न्यायालयात जरूर जावे.
पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी – गोऱ्हे यांचे खुले आव्हान मुळात किरीट सोमय्या हे पाणचट आहेत, असे रवींद्र वायकर बोलले होते, ते खरेच आहे, अशा शब्दांत गोऱ्हे यांनी सोमय्यांची खिल्ली उडवली. ठाकरे कुटुंबावर जे काही जमीन व्यवहाराचे आरोप होत आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवडणुकीत शपथपत्रात सर्व माहिती दिली आहे. एक महिन्यात म्हणजे 12 डिसेंबरपर्यंत सोमय्या यांनी पुरावे द्यावेत, जर त्यांनी पुरावे दिले नाही तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी, असे खुले आव्हान गोऱ्हे यांनी सोमय्यांना दिले.
नारायण राणे वैफलग्रस्त झालेत- गोऱ्हे दिवाळीनंतर ठाकरे सरकार कोसळणार असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते, याबद्दल विचारले असता, गोऱ्हे म्हणाल्या की, नारायण राणे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे तोंडी येईल ती बडबड राणे करत आहेत. गुंडगिरीला कधीही राजाश्रय दिला नाही. उत्तर भारतातील भाजप नेत्यांची महिलांविषयक वक्तव्ये जरा तपासून बघा. मुळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणे हे त्यांच्या वर्मावरचे बोट झाले आहे. त्यामुळे भाजप नेते वारंवार आरोप करत असल्याचे त्या म्हणाल्या.