गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीस सरकारमधील मंत्र्यावर आरोप

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन : प्रसिद्ध वास्तुविशारद अन्वय नाईक (anway-naik-suicide-case) आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांचा जबाब रायगड ऐवजी मुंबईत नोंदवण्यात आला होता. त्यासाठी फडणवीस सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने हस्तक्षेप केला होता, असा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख (home-minister-anil-deshmukh) यांनी केला आहे.

अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी बुधवारी गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील घरातून अटक केली. नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप अर्णव यांच्यावर आहे. नाईक यांनी स्वत: आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तसे नमूद केले आहे. त्यामुळे अर्णव अडचणीत आले आहेत. राजकीय संरक्षण असल्यामुळेच अर्णव यांच्यावर आतापर्यंत कारवाई होऊ शकली नाही, असे आता पुढे येत आहे.

अन्वय यांनी 2018 साली आत्महत्या केली होती. राज्यात तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. गोस्वामी यांचे नाव या प्रकरणात पुढे आल्यानंतर नियमानुसार, त्यांचा जबाब जिथे घटना घडली व गुन्हा दाखल झाला, तिथे नोंदवणे गरजेचे होते. मात्र, एका नेत्याने यात हस्तक्षेप करत तपास अधिकारी अनिल पारसकर यांना मुंबई पोलीस आयुक्तालयातील सह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात अर्णव यांचा जबाब नोंदवण्यास भाग पाडले. पारसकर यांना 26 मे 2018 रोजी तशा सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर 30 मे रोजी गोस्वामी यांचा जबाब नोंदवण्यात आला असे देशमुख म्हणाले.