हे असलं कसलं प्रेम ! पतीनेच पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लावून दिले लग्न, नेमकी भानगड आहे तरी काय?

भागलपूर : वृत्तसंस्था – ‘पती-पत्नी और वो’ हे वाक्य पुरुषांच्या बाबतीत लागू पडते हे ऐकले आहे. मात्र, बिहारमध्ये या उलटं झाले आहे. ही घटना भागलपूरमध्ये घडली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण येथील एका पतीने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं आहे. लग्नाला सात वर्षे झाल्यानंतर पत्नीचे एका परपुरुषावर प्रेम जडलं. पतीने आपल्या प्रेमाच त्याग करुन बायकोचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिले. विशेष म्हणजे त्यांना दोन मुलं आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये बघ्यांची एकच गर्दी उडाली होती.

ही घटना बिहारमधील भागलपूर जवळील सुल्तानगंज येथील आहे. खगडिया जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या सपना कुमारी या महिलेचे सात वर्षापूर्वी सुल्तनगंज याठिकाणी राहणाऱ्या उत्तम मंडल याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर या दोघांचे सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. मात्र, कालांतराने पत्नीचे नात्यातीलच एका अन्य पुरुषावर प्रेम जडलं. त्यानंतर त्या दोघांमध्ये अधिकच जवळीक वाढत गेली. आपल्या पत्नीचे परपुरूषासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पतीला समजली.

पत्नीचे नात्यातील एका युवकावर प्रेमसंबंध असल्याचे समजताच त्याने या संबंधाला विरोध केला. यावरुन दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले. मात्र, सपनाने त्या युवकासोबत असलेले संबंध तोडण्यास नकार दिला. त्यांच्यामधील प्रेमसंबंध सुरुच ठेवले. याला घरच्यांनी आणि नवऱ्याने सतत विरोध केला. पण सपनाने कोणाचे काही एक ऐकले नाही. त्यामुळे पत्नीच्या हट्टासमोर पतीने गुडघे टेकून तिच्या प्रियकरासोबत तिला लग्न करण्याची परवानगी दिली. त्याने राजू कुमार नावाच्या आपल्या नात्यातील प्रियकरासोबत तिचे लग्न लावून दिले.

सुल्तानंगज येथील दुर्गा मंदिरात या दोघांचा अनोखा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला दोन्ही कडील नातेवाईक उपस्थित होते. यावेळी महिलेची दोन मुलं देखील लग्नाला उपस्थित होते. तर नवऱ्याच्या डोळ्यात अश्रूही होते. पण त्याने पत्नीच्या प्रेमाखातर त्याग करुन तिचा विवाह तिच्या प्रियकरासोबत लावून दिला. असे लग्न गावातील मंदिरात होत असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. हा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मंदिराजवळ गर्दी केली. यावेळी पतीने आपल्या पत्निला आणि तिच्या प्रियकराला आशीर्वाद देखील दिले. सध्या जिल्ह्यामध्ये या अनोख्या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे.