कृषी कायद्याला विरोध ! APMC च्या बाजारपेठा उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. देशातील शेतकरी एकवटले असून, दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. सरकारबरोबर झालेल्या चर्चा फोल ठरल्या असून, आता मंगळवारी भारत बंदची हाक आंदोलक शेतकऱ्यांनी दिली आहे. याला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असून, आता मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीही (एपीएमसी) बंदमध्ये सहभागी होणार आहे. एपीएमसीने संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे, तसेच व्यापारी व माथाडी कामगारांवर बेकारीचे संकट ओढावणार आहे. त्यामुळे या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप व व्यापारी असोसिएशनने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी व पणन कायद्यातील बदल तसेच नवीन कायद्यामुळे बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे, तसेच माथाडी कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. या कायद्यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तुर्भे येथील एपीएमसीच्या पाचही बाजारपेठांतील कामकाज मंगळवारी पूर्णत: बंद राहणार आहेत. त्यामुळे बाजार समितीतील व्यापारी, माथाडी कामगार, शेतकऱ्यांनी मंगळवारच्या देशव्यापी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन नरेंद्र पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.