पोलीसनामा ऑनलाइन टीम – क्रिकेट विश्वात संपूर्ण भारताला आनंद देणारी एक घटना आजच्या दिवशी 9 वर्षांपूर्वी घडली. आजच्याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी 2 एप्रिल 2011 ला भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषकावर नाव कोरले होते.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा तो थरार आजही कोणी विसरु शकलेले नाही. शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढवणार्या या सामन्याने अनेकांचीच स्वप्नपूर्ती केल्याचे पाहायला मिळाले होते. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही स्वप्न साकार झाले आहे. यामध्ये संघाशी संलग्न प्रत्येक व्यक्तीसोबतच महत्त्वाची भूमिका महेंद्रसिंह धोनीने निभावली होती.
Biggest Gift to World Dhoni Fans… Year may go.. This Finishing Shot has Separate Fanbase…🤩💥🔥
Thala Dhoni da..😎💥🔥 #Worldcup #Dhoni pic.twitter.com/RkPixxPNPG
— T F C (@itz_TFC) April 2, 2020
28 वर्षांनंतर भारतीय क्रीडारसिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. जेव्हा महेंद्रसिंह धोनीने विजयी षटकार लगावत भारतीय क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा क्षणाची नोंद केली होती. 11 चेंडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाला चार धावांची गरज होती. श्रीलंकेच्या संघाने केलेल्या 274 धावांचा पाठलाग करत भारतीय संघाचे चार गडी तंबूत परतले होते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेत स्ट्राईकवर असलेल्या संघाचा तत्कालीन कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याने संपूर्ण बळ आणि महत्त्वाकांक्षी दृष्टी एकवटत चेंडू आला त्याच गतीने मैदानाबाहेर भिरकावला. हा षटकार लगावल्यानंतर काही क्षणांसाठी धोनीची नजर त्या चेंडूवरच खिळली होती, तो क्षण आणि अवघ्या काही तासांचा तो खेळ प्रत्येकाच्याच मनात भावनांचे काहूर माजवून गेले होते.