मुंबई उच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामीचा अंतरिम अर्ज फेटाळला, सत्र न्यायालयात जाण्याबाबत सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी ( Anvay Naik and his mother Suicide Case ) रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक झाली असून, त्यांना स्थानिक कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटकेविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून, सोमवारी मुंबई हायकोर्टाने (Bombay high court ) अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला (interim-bail-application-rejected-mumbai-high-court ) आहे. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले आहे. त्यामुळे हायकोर्टाकडून अर्णब यांना दिलासा मिळालेला नाही.

तब्बल 6 तासांच्या सुनावणीनंतरही शनिवारीदेखील अर्णब यांना तत्काळ जामीन देण्यास नकार देत, अर्णब यांचा अंतरिम जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. न्या. एस. एस. शिंदे आणि एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब यांना तत्काळ अंतरिम जामीन देऊन सुटका करण्यास नकार दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला आहे. तसेच, फौजदारी दंड संहितेच्या कलम 439 अंतर्गत त्यांना विनंती अर्ज करता येऊ शकतो, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. तर, सत्र न्यायालयात अर्णब यांना जामीन करण्याची मुभा दिली असून, सत्र न्यायालयात 4 दिवसांत यावर निकाल देता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. अर्णब यांच्या तत्काळ जामीन अर्जाला नकार दिल्यामुळे अर्णब यांना अजून काही दिवस कारागृहातच राहावे लागणार आहे, असा अंदाज आहे. 18 नोव्हेंबरपर्यंतच्या न्यायालयीन कोठडीत असलेले अर्णब गोस्वामी यांनी आजच अलिबाग सेशन्स कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे.

अन्वय नाईक व कुमुद नाईक यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी, नितीश सारडा आणि फिरोज शेख हे तिघे 4 नोव्हेंबरपासून अटकेत अाहेत. मात्र, आज मुंबई हायकोर्टाने अर्णब आणि फिरोज या दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.