रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्णब गोस्वामी प्रकरणावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. यामध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचे नाव घेतले आहे. रश्मी ठाकरे यांनी आणि मृत अन्वय नाईक यांच्या जमीन खरेदी व्यवहार झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. या व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावाचा उल्लेखही सोमय्या यांनी केला आहे.

रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाई आत्महत्या प्रकरणात अटक झाली होती. आजचा अर्णब यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. जमीन व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप करताना सोमय्या यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक कुटुंबियांशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले.

रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का? असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

याबाबत एक ट्विट किरीट सोमय्या यांनी केले असून या जमीन व्यवहाराची कागदपत्रेही त्यांनी पोस्ट केली आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ठाकरे कुटुंबिय अन्वय नाईक कुटुंबिय जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना 7/12 प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा जवळच्या कोर्लई किल्ला येथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असे प्रश्न सोमय्या यांनी विचारले आहेत.