Lockdown : परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, CM ठाकरेंची केंद्राकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अकडले आहेत त्यांची निवारा केंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: सहा लाख स्थलांतरीत कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था केली आहे, त्यांची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली आहे. तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. जर 30 एप्रिलनंतर 15 मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर, आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन परराज्यातील अडकलेल्या या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करता यईल का, याचा विचार केंद्र सरकारने करावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मजुरांचा विचार केंद्र शासनाने करावा, एप्रिल अखेरपर्य़ंत यासंदर्भातील गाईडलाईन निश्चित करावी, अशी मागणी आपण प्रधानमंत्री तसेच रेल्वे मंत्रालयाकडे केली असल्याचा पुरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जमांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याची संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या संवादात आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यसचिव अजोय मेहता, केंद्रीय पथकाचे सदस्य, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इतर देशातील रुग्णांचा आणि स्थितीचा अभ्यास व्हावा
राज्यातील 80 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच दिसत नाहीत यामागचे कारण का असावे, जगभरातील स्थिती काय आहे, महाराष्ट्रात ज्या दुबई आणि अमेरिकेतून विषाणूचा प्रवेश झाला त्या अमेरिकेची स्थिती माहित आहे पण दुबईमध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, ते कुठे बरोबर आहे आणि कुठे चुकले आहेत याचा अभ्यास करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.