आता पाकव्याप्त काश्मीरवर ‘नजर’, केंद्र सरकारने दिले ‘संकेत’

इंदोर : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने संविधानातील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्मीरला देण्यात आलेली विशेष स्वायत्ता काढून घेतली आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविण्याच्या घेतलेल्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. असे असतानाच पाकव्याप्त काश्मीरबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठं विधान केलं आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारचं आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं आहे. जम्मू काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो देशाला जोडणं आमचं काम आहे असे विधान प्रकाश जावडेकर यांनी इंदोर येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे.

पाकव्याप्त काश्मीरबद्दल बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘येणाऱ्या काळात केंद्र सरकारची नजर पाकव्याप्त काश्मीरवर राहणार आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारचं आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर घेणं आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान घाबरलं आहे म्हणूनच त्यांच्याकडून व्यापारी, राजकीय संबंध तोडण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. जम्मू काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो देशाला जोडणं आमचं काम आहे.’

काय आहे ‘पाकव्याप्त काश्मीर’ ?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काश्मीरला आपला भाग बनवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने काश्मीरवर आक्रमण केले होते. काश्मीरचे राजा हरी सिंग यांनी भारताची मदत मागितली होती आणि भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला आणि जम्मू काश्मीर काही अटींसह भारतात विलीन झाले. भारतीय सैन्याने पाकिस्तानचा पराभव केला. मात्र पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीरच्या वायव्य प्रांतावर ताबा मिळवला होता. तो भाग अजूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे. या भागाला पाक व्याप्त काश्मीर म्हटले जाते.

आरोग्यविषयक वृत्त