कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग पाथर्डीत यशस्वी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील पूर्व, दक्षिण भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. बुधवारी १९ ठिकाणी ३८ नळकांड्या फवारण्यात आल्या. सी-डॉप्लर रडारवर पाणीदार ढगाच्या इमेज दिसल्यानंतर दुपारी वैमानिकाला उड्डाणाचे आदेश देण्यात आले. वैमानिक आणि सहवैमानिकांनी आदेशानुसार उड्डाण घेत प्राप्त माहितीनुसार फवारणी केली. विमानाने ज्या ठिकाणी प्रयोग केला, त्याचे फोटो तसेच व्हिडिओ तेथील शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवले, असे नोडल ऑफिसर व विभागीय उपायुक्त सतीशकुमार खडके यांनी आज सांगितले.

जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र तालुक्यातील पश्चिम भागात अद्यापही दुष्काळ कायम असून, अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथील विमानतळावरून तालुक्यात प्रथमच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. परंतु वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणावर असल्यामुळे रसायनांची फवारणी केलेले ढग मोहटा गावापासून पूर्व बाजूला सरकले.

करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानूर तसेच बीड जिल्ह्यातील शिरूरपर्यंत या प्रयोगामुळे दमदार पावसाची सुरुवात झाली होती. कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याने येत्या कालावधीत अशा स्वरूपाचा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राबवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –