‘..तर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर कला सादर करू’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – उपोषण करणाऱ्या कलाकेंद्र चालक व कलावंतांची प्रकृती खालावल्याने सहाव्या दिवशी त्यांनी उपोषण मागे घेतले. दहा दिवसात जिल्हा प्रशासनाने आम्हाला न्याय दिला नाही, तर पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्या घरासमोर कला सादर करून तीव्र आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अरुण जाधव यांनी दिला आहे.

हेही वाचा – साईभक्तांसाठी मुंबई-शिर्डी स्वतंत्र पालखीमार्ग  

कलावंतांच्या मागण्या जिल्हा प्रशासनाला कळविण्याच्या लेखी आश्वासनानंतर सहाव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून कलाकेंद्र चालक व कलावंतांचे बेमुदत उपोषण सुरू होते. रवी कांबळे, राहुल राळेभात, संतोष काळे, मंगल जाधव आदींची प्रकृती खालावली होती. त्यामुळे उपोषणकर्त्यांना उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी कला केंद्रांच्या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाला कळविले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, अ‍ॅड. हर्षल डोके, एम. पाटील, अमोल लोखंडे, गुलशन अंधारे, सर्फराज शेख यांच्यासह सर्व कलाकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना अरूण जाधव म्हणाले की, जर दहा दिवसात जिल्हा प्रशासनाने आम्हाला न्याय दिला नाही. तर आम्ही सर्व कलाकारांना घेऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय व पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊ. एकाच दिवशी आमची कला सादर करून तीव्र आंदोलन करू.

फक्त मोहातच कायदा-सुव्यवस्था का ?

कायदा-सुव्यवस्था फक्त मोहा हद्दीतील कला केंद्रामुळेच होते. इतर कलाकेंद्रांमुळे होत नाही का, असा सवाल स्वराज कलाकेंद्राचे मालक एम. पाटील यांनी उपस्थित केला. 22 फेब्रुवारी रोजी कलाकेंद्रांना लायसन्स कसे दिले आणि त्यानंतर कायदा-सुव्यवस्था कशी बिघडली. राजकीय दबावापोटी अधिकाऱ्यांनी परवानगी रद्द केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.