मोदी सरकारच्या कलम 370 आणि तिहेरी तलाकच्या निर्णयावर अरूण जेटलींचा शेवटचा ब्लॉग

नवीदिल्ली : वृत्तसंस्था :  महाविद्यालयापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे अरुण जेटली यांनी केंद्रात अर्थ पासून ते सरंक्षण अशा अनेक मंत्री पदांचा कारभार उत्तम पद्धतीने हाताळला. २०१४ साली लोकसभेची निवडणूक हारुनही जेटली हे केंद्रात मंत्री झाले होते. त्यानंतर मात्र २०१९ च्या निवडणुकानंतर त्यांनी स्वतः पंतप्रधानांना पत्र लिहून मला आरोग्याची काळजी घ्यायची असून कोणत्याही खात्याचा मंत्रिभार नको असे सुचवले होते.

आजारी असतानाही जेटली यांची देशातील राजकारणावर नजर होती. अरुण जेटली ब्लॉगच्या माध्यमातून वेगवेळया मुद्यांवर आपली मते मांडायचे. अलीकडेच मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले व तिहेरी तलाक विरोधात कायदा केला. या दोन ऐतिहासिक निर्णयांसंदर्भात अरुण जेटली यांनी लिहिलेला ब्लॉग त्यांचा अखेरच ब्लॉग ठरला.

जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मनात ३७० कलम हटवल्याबद्दल कौतुक केले होते. ते आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात ऐतिहासिक विधेयके मंजूर झाल्यामुळे संसदेचे चालू अधिवेशन सर्वात फलदायी ठरले. तिहेरी तलाक विरोधी कायदा, दहशतवाद विरोधी कायदा बळकट करणे आणि कलम ३७० रद्द करणे हे सर्व निर्णय अभूतपूर्व आहेत.

कलम ३७० बद्दल बऱ्याच वर्षांपासून पक्षाकडून दिले जाणारे आश्वासन पाळल्याबद्दल अरुण जेटली समाधानी होते. भाजपाच्या विरोधकांना कलम ३७० हटवणे अशक्य वाटत होते. आजारी असूनही जेटली आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विरोधकांना चांगलेच सुनावत होते.

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. आज अखेर त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. नोटबंदी आणि जीएसटी यांसारखे धाडसी निर्णय जेटलींनी आपल्या कारकिर्दीत घेतले होते.. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 मिनिटांनी जेटलींनी अखेरचा श्वास घेतला.

आरोग्यविषयक वृत्त –