तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाचा उल्लेख करत जेटलींनी पाकिस्तान सरकारने हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी योग्य ते पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. त्यावर जेटली यांनी म्हटले की, हल्ला करणाऱ्यांबाबत कोणतीही माहिती नसती तर पाकिस्तान सरकारला योग्य पुराव्यांची गरज असती परंतु तुमच्या देशात बसलेल्या व्यक्तीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. भारत या हल्ल्याचा अतिशय संताप व्यक्त करत आहे. आतापर्यंत जीवनात अनेक युद्ध पाहिली आहेत, अनेक मानवी आपत्ती पाहिल्या, दहशतवाद्यांकडून करण्यात आलेली पंतप्रधानांची हत्या पाहिली आहे. परंतु, या हल्ल्याविरोधातील संताप अतिशय उफाळून आला आहे. पाकिस्तान आपल्या कुरापती थांबवण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे भारत ही निर्णायक लढाई जिंकण्यासाठी आपल्या सर्व राजकीय तसेच इतर सर्व संसाधानांचा वापर करणार असल्याचे यांनी म्हटले आहे.
जागतिक व्यापार परिषदेत बोलताना जेटलींनी ही लढाई एका आठवड्याची नाही. याला विविध मार्गांनी लढा द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. आम्ही सर्व भारतीयांच्या भावना समजू शकतो. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानात मैत्रीपूर्ण किंवा प्रतिस्पर्धी म्हणून क्रिकेट सामना खेळला जाऊ शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.