दिल्ली विधानसभा : इम्रान खानच्या मंत्र्यानं केलं नरेंद्र मोदींना हरवण्याचं ‘आवाहन’, केजरीवालांनी दिलं एकदम ‘कडक’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण तापत असतानाच शेजारील राष्ट्र पाकिस्तानने देखील या निवडणुकीत लक्ष घातले आहे. मात्र, या निवडणुकीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानला कडक शब्दात उत्तर दिले आहे. केजरीवाल भाजप विरोधात लढत असले तरी त्यांनी पाकिस्तानला दिलेल्या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसैन हे भारत विरोधात बोलण्याबाबत ओळखले जातात. त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे की, भारतातील लोकांना मोदींना पराभूत करायचे आहे. सध्या ते दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते लोकांना घाबरवत आहेत. त्यामुळे ते आश्वासनं देत आहेत. काश्मीर, सीएए आणि ढासळती अर्थव्यवस्थेमुळे ते देशात आणि जगभरात मिळत असलेल्या प्रतिक्रियांमुळे त्यांची मानसिकता ढासळली आहे, असे ट्विट करून चौधरी यांनी म्हटले होते.

चौधरी फवाद यांच्या ट्विटला उत्तर देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकदम कडक शब्दात उत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते माझे सुद्धा पंतप्रधान आहेत. दिल्ली निवडणूक भारताचा अंतर्गत विषय आहे. दहशतवाद्यांच्या प्रायोजकांचा हस्तक्षेप आम्ही अजिबात सहन करणार नाही असे उत्तर केजरीवाल यांनी दिले आहे.