‘मुख्यमंत्री पदावर आपण येऊ असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत राज्यातून उत्तीर्ण झालेल्या भावी अधिकाऱ्यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. विधिमंडळातल्या सभागृहात झालेल्या एका खास कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भावी अधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. यावेळी अजित पवार यांनी आपल्या शैलीत तुफान टोलेबाजी करत आपला प्रशासनातील अनुभव सांगितला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी नशीब घेऊन आलेला मुख्यमंत्री आहे. असा मुख्यमंत्री कधीही झाला नसले. मुख्यमंत्री पदावर आपण येऊ असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र जे झालं ते तुमच्यासमोर आहे. माझ्यासमोर महाराष्ट्राचे वैभव बसलेलं आहे. तुमच्यात आणि माझ्यात एक साम्य आहे, ते म्हणजे तुम्ही कठीण परीक्षा देऊन पास झालेला आहात. आणि मी देखील कठीण परीक्षा पास होऊन मुख्यमंत्री झालेलो आहे. दोघांनाही प्रशासनाचा अनुभव नाही.

सगळी आपलीच माणसे आहेत, कारण विरोधी पक्षात असलेले माझ सहकारी होते, आधी विरोधी पक्षात असलेले आता माझे सहकारी आहेत. काही जणांना वाटते की मध्यवर्ती परीक्षा व्हाव्यात, आता तर कोरोनामुळे परीक्षा पण पुढे ढकलल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले, जनतेचा पाठिंबा असेपर्यंतच आम्ही साहेब असतो. नंतर कुणी विचारत नाही. तुम्ही मात्र कायमचे साहेब असता. त्यामुळे त्याच प्रमाणे काम करा. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रशासनात पदार्पण करणाऱ्या या अधिकाऱ्यांना काही सल्ले दिले.

अधिकारी म्हणून नियमावर बोट ठेवून राहू नका, नियमाने वागा पण कागद वाचण्यापेक्षा त्यामागील माणसाला बघून काम करण्याचा प्रयत्न करा. आमचं कसं आहे की जनतेचा पाठिंबा असेपर्यंतच आम्ही साहेब असतो. नंतर कुणी विचारत नाही. तुम्ही मात्र कायमचे साहेबच राहणार आहात. फाईलमध्ये नकारात्मक पद्धतीने बघू नका, प्रश्न सोडवण्यावर भर द्या. चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा असं सांगत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.