जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा : ओवेसी

हैदराबाद : वृत्तसंस्था – एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा आहे. मोदींना भारताचा इतिहास जमावाकडून झालेल्या हत्यांसाठी लक्षात ठेवेल, अशी टीका ओवेसी यांनी केली. मोदींच्या कार्य़काळात देशात जमावाकडून सर्वाधिक हत्या झाल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.

गोमांस विक्री, गोमांस वाहतूक यावरून तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यावरून ओवेसींनी मोदींवर शरसंधान साधले. या घटना मोदींना कायम घाबरवतील, कारण पंतप्रधान असूनही त्यांना या घटना रोखता आल्या  नाहीत, असे ही ओवेसी म्हणाले. आसाममध्ये रविवारी एका मुस्लिम व्यक्तीला जमावाकडून मारहाण करण्यात आली. त्याला जबरदस्तीने गोमांस खाण्यास भाग पाडण्यात आले. ओवेसींनी या घटनेचा निषेध केला. ज्या राज्यात गोमांसावर बंदी नाही, तिथले लोक गोमांस खातात, तिथे शौकत अली नावाच्या एका ६८ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केली जाते. त्याला जबरदस्तीने गोमांस खायला लावले जाते, यापेक्षा वाईट काय असू शकते ? असे ओवेसी म्हणाले.

‘आपलंच सरकार सत्तेत आहे. त्यामुळे आपल्याला वाचवलं जाईल, ही गोष्ट शौकत अली यांना मारहाण करणाऱ्यांना माहीत होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अशा प्रकारच्या वृत्तींना प्रोत्साहन मिळालं,’ अशा शब्दांत त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. ‘मोदी सर्वांसाठी बोलत नाही. ते केवळ संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्यांचे चौकीदार आहेत. स्वत:ला देशापेक्षा मोठं न मानणाऱ्या व्यक्तीला मत द्या,’ असं ओवेसी म्हणाले.