आता भंडारा जिंकू “ठोकून”, पालघर जिंकू “ठासून” : आशिष शेलार यांचे ट्विट

मुंबई: पोलिसनामाऑनलाईन

भाजपच्या कर्नाटकातील विजयानंतर पक्षाच्या नेत्यांची कॉलर चांगलीच ताठ झाली आहे. कर्नाटकात घवघवीत यश मिळाल्यानंतर पक्षाचे नेते आपल्या आक्रमक प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विधानावरून याचा प्रत्येय येऊ शकतो, शेलार यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, कर्नाटकात जिंकलो मतदारांचे आभार! आता भंडारा जिंकू “ठोकून”, पालघर जिंकू “ठासून”.

आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्या या ट्विटमुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.कर्नाटकचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्ष संघटनेत लावलेल्या रचनेचा, अपरंपार मेहनतीचा विजय आहे तसेच गरीब माणसांचा नेता असा चेहरा म्हणून येडियुरप्पा यांचाही विजय आहे, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

भंडारा -गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असेल. यात राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे तर भाजपाकडून हेमंतकुमार पटले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याकडून आघाडीच्या उमेदवाराल जिंकवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार सामना होण्याची शक्यता आहे.तर पालघरमध्ये भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेने परस्पर उमेदवारी देऊ केली आहे. तर भाजपाने आयत्यावेळी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना गळाला लावत शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले आहे. ही जागा भाजपाची असल्यामुळे शिवसेनेने निवडणुकीतून माघार घ्यावी, असा इशारा वारंवार भाजप नेतृत्त्वाकडून देण्यात आला होता. मात्र, शिवसेनेने त्याकडे साफ दुर्लक्ष करत भाजपविरोधात दंड थोपटले आहेत.