पोलिसांच्या कामगिरीची नाही तर ‘त्या’ मजेशीर ट्विटची चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात. पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची चर्चा तर होतेच मात्र, सध्या पोलिसांच्या एका ट्विटची चर्चा जोरात सुरु आहे. कोणाचा गांजा हरवला असेल तर पोलीस स्थानकामध्ये येऊन घेऊन जा, असे मजेशीर ट्वीट आसाम पोलिसांनी केले आहे. आसाम पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा पकडला आहे. पोलिसांच्या या कामगिरीऐवजी पोलिसांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सरु आहे.

मंगळवारी (दि.४) आसाम पोलिसांनी तब्बल ५९० किलो गांजा पकडला आहे. बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून धुबरी भागात पोलिसांनी ही कारवाई केली. यानंतर पोलिसांनी हे मजेदार ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, ५९० किलो गांजा आणि ट्रक चंगोली चेकपॉईंजवळ काल रात्री हरवला आहे का ? त्रास करून घेऊ नका, आम्हाला तो सापडला आहे. कोणाचा ट्रक असेल तर त्यांनी धुबरी पोलिसांशी संपर्क करावा. पोलीस तुमची नक्कीच मदत करतील. असे ट्विट पोलिसांनी केले आहे.

आसाम पोलिसांनी ज्याप्रकरे मजेशीर ट्विट केले आहे. असेच मजेशीर ट्विट करण्यात मुंबई पोलीस देखील मागे नाहीत. त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी अपघाताबाबत जनजागृती करण्यासाठी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनी गल्ली बॉय या चित्रपटातील डायलॉगचा आधार घेतला होता.