नाशिकमध्ये विवाहाचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – जीवनात लग्न हा महत्वाचा विधी पण आहे आणि ते एक सगळ्यात मोठं कार्य आहे  प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व सेटल असावा असेच वाटते़ मोबाईलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडीयामुळे तर अनोळखी व अपरिचित लोकांबरोबर ओळख करून  त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येतात़ सोशल मीडीया वा ओळखीतील परिचितांकडून विश्वास निर्माण करून आपण विवाह करू अशी आशा दाखवून शारीरिक संबंध निर्माण करायचे आणि नंतर सोडून द्यायचे त्यामुळे बलात्कारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे साठ टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या अमिषाने झाल्याचे समोर आले आहे़
शहरातील तेरा पोलीस ठाण्यात आणि सायबर पोलीस ठाण्यांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर २०१८ या १० महिन्यांमध्ये ४२ गुन्हे दाखल झाले त्यापैकी ४० गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे़.  पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांपैकी सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या भुलीला बळी पडल्याने झाले आहे पोलिसांकडील आकडेवारीवरून समोर आले आहे़ विवाहाच्या अमिषास केवळ अविवाहित तरुणीच नव्हे तर विवाहित महिला व अल्पवयीन शाळकरी मुलीही बळी पडल्या असून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत़
शहर पोलिसात दाखल बलात्काराचे गुन्हे
———————————————–
वर्षे                     गुन्हे             उघड
———————————————–
२०१८                 ४२             ४० (आक्टोबरपर्यंत)
२०१७                ३६             ३६
२०१६                ३०              ३०
———————————————–
तीन वर्षे            १०८            १०६
मूळात ‘विवाह’ हे व्यक्तिंमधील नाते संबध निर्माण करणारे सामाजिक बंधन अथवा कायदेशीर करार असतो़ मात्र, सोशल मीडीयाच्या व्हर्च्युअल जगात वावरणारी तरुणाई विशेषत: तरुणी याकडे दुर्लक्ष करतात़ काही महिन्यांपुर्वीच ओळख झालेल्या व्यक्तीने दिलेल्या विवाहाच्या अमिषास भुलून आपले सर्वस्व बहाल करतात़ यानंतर काही दिवसांनी संबंधित अनोळखी तरुणाचा पुर्वीच विवाह झाल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे समोर येते़ पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांमध्ये गतीमंद, अल्पवयीन व शाळकरी मुलींना विवाहाचे अमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटनांची संख्याही तुलनेने अधिक आहे़
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत तीन वर्षांत १०८ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत़ या गुन्ह्यांतील कारणांचा आढावा घेतला असता नातेसंबंध,ओळखीतील तरुण तसेच सोशल मीडीयाच्या माध्यमातून विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम व विवाह जमविणारी संकेतस्थळे यावरून ओळख वाढवून प्रथमत: विश्वास निर्माण केला जातो़ यानंतर विवाहाचे अमिषाने तरुणींना भावनिक करून त्यानावाखाली बलात्कार केला जातो़ यावर कळस म्हणजे प्रेमसंबंधातून झालेल्या शरीरसंबंधांचे गुपचूप व्हिडीओ काढून ते सोशल मीडीयावर टाकून खंडणी उकळल्याचे प्रकारही घडले आहेत.