विहिरीला पाणी न लागल्याने शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पशा शेतीत गुजराण होत नसल्याने कर्ज काढून विहीर खोदली, मात्र विहिरीला पाणीच न लागल्याने शिवना (ता.सिल्लोड) येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी (दि. 17 ) पहाटे ही घटना उघडकीस आली.

योगेश यादवराव गव्हांडे (वय 31, रा. शिवना) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेशकडे अवघी दोन एकर जमीन होती. चारचाकी वाहनावर चालक म्हणून त्याने सुरुवातीला कसाबसा संसाराचा गाडा रेटला. त्यानंतर विविध कार्यकारी सेवा संस्थेसह खासगी कर्ज काढून विहीर खोदली. मात्र, विहिरीला पाणीच लागले नाही. त्यात कर्जाची परतफेड होत नसल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेशच्या पश्चात्य आई, पत्नी, तीन लहान मुली असा परिवार आहे. अजिंठा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली असून बिट जमादार निलेश सिरसकर तपास करत आहेत.