औरंगाबादकर धास्तावले ! एकीकडे ‘कोरोना’ तर दुसरीकडे ‘सारी’चे संकट , 11 दिवसात 10 जणांचा बळी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता इतर जिल्ह्यात देखील कोरोनाचा वेगाने फैलाव होताना दिसत आहे. अशातच औरंगाबादकरांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. कारण औरंगाबादेत कोरोनासोबतच ‘सारी’ या आजराचे नवे संकट उभे ठाकले आहे. ‘सारी’ म्हणजेच (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) या आजराने केवळ ११ दिवसात १० जणांचे बळी घेतले आहेत. शहरातील २३ रुग्णांवर सारीचे उपचार घाटी रुग्णालयात केले जात आहेत.

काय आहेत ‘सारी’ची लक्षणे

सारीच्या रूग्णांमध्ये कोरोनासारखीच लक्षणे आहेत. रूग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारचे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे सारीचा रूग्ण हा कोरोनाही असू शकतो. ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहे.

सारी आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये साम्य

‘सारी’ या आजाराने अकरा दिवसात दहा जणांचे बळी घेतले असून शहरातील सारीच्या रूग्णांची संख्या 103 वर पोहचली आहे. सद्यस्थितीत सारीच्या 23 रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने साथीच्या आजाराने डोके काढण्यास सुरूवात केली. खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर छातीवर सूज येणे, उलट्या आदी आजाराने त्रस्त रूग्ण वाढत गेले. कोरोना व्हायरसप्रमाणे सारी या आजाराचीही सर्दी, खोकला ताप हीच लक्षणे आहेत.आतापर्यंत 103 रूग्णांवर सारीच्या आजाराने उपचार केल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

घाटी रुग्णालयात उपचार सुरु

कोरोना व्हायरसचे मार्च महिन्यापासून आजपर्यंत 14 रूग्ण आढळून आले. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी सारीचेही रूग्ण आढळून येत होते़ सारी आणि कोरोना या दोन्हींची लक्षणे काहीशी सारखीच आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयांना सारीच्या रूग्णांचीही माहिती नियमितपणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यासून खासगी आणि शासकीय रूग्णालयांकडून सारीच्या रूग्णांची माहिती महापालिकेकडे येत आहे. सारीच्या 103 रूग्णांपैकी निम्मे रूग्ण हे घाटी रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर उर्वरित रूग्ण हे शहरातील विविध रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्या सर्वांचे स्वॅब तपासण्यात येत आहेत, असं घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन डोईबळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.