Aurangabad News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत 29 जानेवारीला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी घेतलेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. 18) जाहीर झाले. निवडणुकीत अनेकांनी मोठ्या मेहनतीने विजय मिळविला. त्यानंतर विजयी उमेदवारांचे सर्व लक्ष सरपंच आरक्षण सोडतीकडे लागले होते. आता प्रशासनाने आरक्षण सोडतीची तयारी केली आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच पदासाठी सोडत दि. 29 जानेवारीला निघणार आहे. त्यामुळे सोडतीत काय होणार, कोणते आरक्षण निघणार याबाबत इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

जिल्ह्यात 617 ग्रामपंचायतीसाठी निवडणुक घेण्यात आली. त्यानंतर आता प्रशासनाने 29 जानेवारीला तहसीलस्तरावर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार म्हणाले की, यापूर्वी आठ डिसेंबरला शासन आदेशानुसार सरपंच, उपसरपंच पदासाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली होती. पण ही सोडत शासन आदेशानुसार रद्द केली गेली. आता येत्या 29 जानेवारीला नव्याने सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानुसार तहसीलदारांना कळविण्यात आले आहे. ही सोडत नव्याने निघणार असली तरी सोडतीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविली जाणार आहे.