Sangli News : औरंगाबाद नामांतरप्रश्नी राजकारण नको !

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी कोल्हापूर, सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगली येथे पत्रकारांशी सवांद साधला त्यावेळी बोलताना ते म्हणाले कि, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची इच्छा बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. त्यामुळे त्यांच्या विचाराशी, भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहोत. यावरुन कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मंत्री शिंद म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. त्याठिकाणच्या लोकांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे आम्ही त्या मागणीला पाठींबा देत आहोत. शासन म्हणूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीत यावरुन मतभेद असल्याचे चित्र चुकीचे आहे. यात राजकारण कुणीही आणू नये. त्यामुळे योग्य वेळी याचा निर्णय होईल. आमची भूमिका आम्ही ठामपणे मांंडली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने आमची कोंडी झाल्याची चर्चा चुकीची आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, सांगली महानगरपालिकेत आमचा एकही नगरसेवक नाही, तरीही आम्ही महापालिकेला निधी दिला. त्यामुळे आम्ही विकासकामे करताना राजकारण आणत नाही, ही गोष्ट स्पष्ट होते, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.