चीनच्या या शिष्टमंडळाचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वागत केले. महापौरांसोबत चर्चा करताना मंत्री ली म्हणाले, की पर्यटन, व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने शिष्टमंडळ शहरात दाखल झाले. दोन्ही देशांदरम्यान ४७ विमानांच्या सेवा असून, विमानांची संख्या वाढवण्याचा मानस आहे. चीन ते ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या भारतामध्ये चीनचा ८४.४ मिलियन डॉलरचा व्यवसाय आहे. त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आहे. गेल्यावेळी २.४० मिलियन डॉलरचे बासमती तांदूळ, साखर, डाळ खरेदी करण्यात आली होती असे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते जमीर कादरी, उपायुक्त मंजूषा मुथा, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, उद्यान अधीक्षक विजय पाटील, डी. पी. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. चीनच्या शिष्टमंडळामध्ये मंत्री बिलियन ली, हुंग गँग, यांग ताईनवेन, सॅन कॅन, झांग जिंस्किन, फॅन हाओनणं, वांग शिकाइ, टँगगुओ कोई यांचा समावेश होता.
चीनचे भारतामध्ये २४० उद्योग आहेत. त्यातील ४० कंपन्या महाराष्ट्रात आहेत. त्यातून दोन लाख रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च शिक्षणासाठी दरवर्षी भारतातून २०,००० विद्यार्थी चीनमध्ये जातात तर चीनमधून २००० विद्यार्थी भारतात येतात. यामध्ये वाढ करण्यासाठी चीनकडून प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.