विशेष म्हणजे अवघ्या सात महिन्यांत सुनावणी पूर्ण झाली. सुनावणी जलदगती कोर्टात न होता नियमित कोर्टासमोर सुरु होती. अवघ्या दीड वर्षात आरोपी शिक्षेस पात्र ठरले आहेत. दरम्यान, हा दुर्मिळातील दुर्मिळ आणि समाजाला काळीमा फासणारा प्रकार असून दोन्ही आरोपींना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली होती. तर, अभिलाष एपिलेप्सी आजाराने ग्रस्त असून शिक्षा सुनावण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी विनंती त्याच्या वकिलांनी कोर्टाकडे केली होती.
काय आहे प्रकरण ?
२७ फेब्रुवारी २०१७ रोजी आरोपींनी आधी वर्धनचे अपहरण केलं, त्यानंतर दौलताबाद घाटात त्याची रुमालाने गळा आवळून हत्या केली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट न लावता तो कारच्या डिकीत ठेवून ते कॉलनीत परतले.
चिठ्ठीवरून पकडले आरोपी –
पाच कोटी रुपयांची खंडणी पुणे रस्त्यावरील स्माईल स्टोन ढाब्याजवळ आणून द्या,अशी चिठ्ठीच आरोपी अभिलाषने वर्धनच्या घरात टाकली होती. त्यावेळी सोसायटीत राहणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत खडके, चंद्रकांत खंदारे, शांतीलाल बारवाल यांना अभिलाष आणि शाम मगरे यांच्यावर संशय आला. त्यांनी लगेच याबाबतची माहिती जवाहरनगर पोलिसांना कळविली. खडके यांनी अभिलाषकडे वर्धनविषयी विचारपूस करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. काही वेळात तेथे दाखल झालेल्या जवाहरनगर पोलिसांच्या मदतीने अभिलाष आणि शाम यांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत वर्धनला दौलताबाद घाटात नेत रुमालाने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह श्रेयनगरमधील नाल्यात फेकल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही ठरला पुरावा –
लाल रंगाच्या उघड्या स्पोर्टस् कारमधून आरोपींनी वर्धनला टिळकनगर येथून दौलताबादच्या घाटात नेले. तेथे त्याचा रुमालाने गळा आवळून खून केल्यानंतर त्याला कारच्या डिक्कीत टाकून परत श्रेयनगरमध्ये आणले आणि तेथील नाल्यात वर्धनचा मृतदेह त्यांनी फेकला होता. टिळकनगर येथून वर्धनला नेत असताना मार्गावरील सीसीटीव्हीत कारमध्ये वर्धन आणि आरोपी बसलेले दिसत होते, तर परत येण्याच्या आरोपींच्या प्रवासादरम्यान ते दोघेच कारमध्ये असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने चित्रित केले होते. या तांत्रिक पुराव्याद्वारे आरोपी वर्धनला कारमधून नेत असल्याचे आणि परत येताना त्यांच्यासोबत वर्धन नसल्याचे सिद्ध झाले.
टीव्हीवर लागणारी ‘सावधान इंडिया’ ही गुन्हेगारीविषयक मालिका पाहून या दोन्ही आरोपींनी हा अपहरण आणि हत्येचा कट रचला होता, असे तपासादरम्यान स्पष्ट झाले होते.