धक्कादायक ! रिक्षा चालकाचा खून करून जाळलं

मानवत : पोलीसनामा ऑनलाइन – परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये एका 33 वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना आज (गुरुवार) समोर आली आहे. ही घटना मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारातील पेट्रोल पंपाजवळ घडली. अख्तर जलील शाह (वय-33) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो रिक्षा चालक आहे. त्याची रिक्षा मृतदेहापासून एक किलोमीटरवर पोलिसांना आढळून आली.

अख्तर शाह हा अ‍ॅपे रिक्षा चालवत होता. बुधवारी रात्री आठ वाजता भाडे घेऊन जात असल्याचे सांगून घरातून निघाला. मात्र रात्री उशीरापर्यंत घरी आला नसल्याने घरच्यांनी त्याचा शोधाशोध सुरु केला. मा्त्र, त्याचा शोध लागला नाही. अखेर त्याचा भाऊ तन्वीर जलील शाह याने मानवत पोलीस ठाण्यात अख्तर याच्या बेपत्ता होण्याची तक्रार केली.

पोलिसांनी तपास सुरु केला असता, पाथरी – परभणी महामार्गावर बोरगावजवळ अख्तरची रिक्षा (एमएच 38 पी 1035) आढळून आली. मात्र तो रिक्षात नसल्याने त्याचा शोध घेतला असता ज्या ठिकाणी रिक्षा आढळून आली त्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडबोरगाव शिवारातील पेट्रोल पंपाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. एका कापसाच्या शेतात अख्तरचा खून करून मृतदेह जाळण्यात आला होता.

अख्तरच्या घरच्यांना मृतदेह दाखवला असता त्यांनी मृददेह अख्तरचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अख्तरचा खून नेमका कोणत्या कारणासाठी आणि कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.