Birds Flu : ‘मोदींनी पक्ष्यांना खायला दिले दाणे अन् पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू ( bird flu)कहर सुरु आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लू या आजाराने शिरकाव केला आहे. मात्र आता बर्ड फ्लूवरुन राजकारण सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन जोरदार निशाणा साधला आहे. आय. पी. सिंह यांनी मोदी मोराला दाणे खायला घालत असतानाचा फोटो ट्विट केला आहे. तसेच “या माणसाचं काय करावं?, पक्ष्यांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले” असे कॅप्शन आय. पी. सिंह यांनी दिले आहे.

तर भाजपाचे राजस्थानमधील आमदार मदन दिलावर यांनी देशात बर्ड फ्लूचा फैलाव होण्यामागे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा हात असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. आमदार दिलावर म्हणाले की, शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेतकरी दररोज चिकन, बिर्याणीसह अन्य लज्जतदार पदार्थांवर ताव मारत आहेत. पार्ट्या करत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूच्या फैलावाचा धोका सातत्याने वाढत आहे. देशात बर्ड फ्लू पसरवण्यामध्ये शेतकरी आंदोलनाचा मोठा हात आहे. दरम्यान, दिलावर यांनी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांमध्ये दहशतवादीही लपून बसल्याचीही शंका व्यक्त केली आहे.

https://twitter.com/IPSinghSp/status/1347429231442030592

देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव झाला आहे. आणखी कोणत्या राज्यांत बर्ड फ्लूची साथ पसरण्याचा धोका आहे, याचा अंदाज घेऊन केंद्रीय पशुसंवर्धन खात्याने विविध ठिकाणी पाहणी सुरू केली आहे. दिल्लीमध्ये कोंबड्या किंवा अन्य पाळीव पक्षी आणण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. तसेच देशभर कोरोनाच्या साथीने थैमान घातलेले असतानाच आता त्यात बर्ड फ्लूची भर पडल्याने केंद्र तसेच राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

कुठेही पक्षी मरण पावल्याची घटना नजरेस आली तर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील पशुसंवर्धन खात्यांकडून त्याची तातडीने दखल घेतली जात आहे. उत्तर प्रदेशमधील संग्रामपूर येथेही सहा कावळे मरण पावल्याचे निदर्शनास आले. कानपूरचे प्राणी संग्रहालयही काही दिवसांसाठी बंद केले आहे. मध्य प्रदेशमधील 13 जिल्ह्यांमध्ये फैलाव झाला आहे. पंजाबमध्ये अन्य राज्यांतून कोंबड्यांची आयात करण्यास 15 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.