नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्फत आज राष्ट्रपती भवनात ६१ वा ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी आणि ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे उपस्थित होते. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथील तेजस्विनी सोनवणे, मुंबईमधील सागर कांबळे, रतनकृष्ण साहा आणि दिनेश पांड्या या चार जणांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. हा पुरस्कार ललित कला क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो.
६१ व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारासाठी देशभरातून ५ हजार कलाकारांचे अर्ज प्राप्त झाले होते. ५ हजार कलाकारांमधून उत्कृष्ट अशा १५ जणांची निवड केली गेली. या पुरस्काराचे स्वरूप २ लाख रूपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे होते. १५ जणांमध्ये ४ कलाकार हे महाराष्ट्र राज्यातील होते.
President Kovind conferred the 61st annual Lalit Kala Akademi Awards on 15 meritorious artists at a function held at Rashtrapati Bhavan today. pic.twitter.com/dQ14M2HFII
— President of India (@rashtrapatibhvn) March 4, 2020
मूळच्या सोलापूरच्या असलेल्या तेजस्विनी सोनवणे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या फाईन आर्ट महाविद्यालयातून बॅचलर ऑफ फाईन आर्टचे तर मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून मास्टर ऑफ फाईन आर्टचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना प्रिंट मेकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ मध्ये दक्षिण कोरियातील बुसान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता, तसेच मुंबई, दिल्ली,पटना, कोलकत्ता, भुवनेश्वर आणि खजुराहो येथील प्रदर्शनात सहभाग घेतला होता.
सागर कांबळे हे मूळचे डोंबिवली येथील रहिवासी असून, त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून क्रिएटीव्ह पेंटिंगचे शिक्षण पूर्ण करून सागर कांबळे यांनी कलाक्षेत्रातील प्रवास सुरू केला. त्यांनी पेंटिंग श्रेणी मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना एकूण २४ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
रतनकृष्ण साहा (रा.सायन) यांना मुर्तीकलेतील उत्कृष्ट योगदानासाठी गौरविण्यात आलं. साहा यांनी बडोदा येथील एम.एस.विद्यापीठातून मूर्तीकलेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ब्रिटन आणि अमेरिकेमधील मूर्तीकलेच्या समूह प्रदर्शनातही त्यांनी सहभाग घेतला होता. मूर्ती कलेतील योगदानासाठी त्यांना विविध राज्यांचे पुरस्कार आणि शिष्यवृत्या देखील मिळाल्या आहेत.
दिनेश पांड्या (रा.घाटकोपर) यांना आर्ट फोटोग्राफीतील उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं. त्यांनी आपले शिक्षण सर जे. जे. आर्ट ऑफ स्कूल मधून पूर्ण केलेले आहे. देश-विदेशातील १५ समूह चित्रप्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. १९८९ मध्ये त्यांना ब्रिटीश कॉन्सीलची फेलोशिफ मिळाली आहे. मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई आणि लंडनमध्ये त्यांनी चित्रप्रदर्शन लावले होते.
६१ व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी चे प्रदर्शन पुरस्कार प्राप्त १५ कलाकारांसह एकूण २८४ कलाकारांच्या कलाकृती सह दिल्लीच्या मुख्यालयात राष्टीय ललित कला अकादमीच्या वतीने लावण्यात येणार आहे.