‘या’ 5 न्यायाधीशांनी दिलाय अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टाने आज (शनिवार) सकाळी साडेदहा वाजता ऐतिहासिक आयोध्या प्रकरणी निकाल सुनावला आहे. आयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्य़ायी जागा द्यावी, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाने म्हटले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यामूर्ती एस.ए. बोबडे, न्यामूर्ती धनंजय वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर हे 5 जण खंडपीठातील सदस्य होते.

1) सरन्यायाधीश रंजन गोगोई, चीफ जस्टिस ऑफ इंडिया
सरन्यायाधीश रंजन गोगोई हे या 5 सदस्यीय खंडपीठाचे अध्यक्ष होते. त्यांनी 3 ऑक्टोबर 2018 मध्ये सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्विकारला. 1978 मध्ये बार काऊंसिल जॉईन केले होते. 2001 साली गुवाहाटी हाय कोर्टात ते न्यायाधीश झाले. तसेच पंजाब आणि हरयाणा हाय कोर्टात ते 2010 मध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. 2011 ला पंजाब-हरियाणा हाय कोर्टात त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 23 एप्रिल 2012 मध्ये गोगोई सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती झाले. सरन्यायाधीश म्हणून गोगोई यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक खटल्यांवर सुनावणी केली. यामध्ये आयोध्या राम जन्मभूमी वाद, NCR सह जम्मू-काश्मीर सारख्या याचिकांचा समावेश आहे.

2) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे
या खंडपीठातील दुसरे न्यायमूर्ती गोगोई यांच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाचा कार्य़भार स्वीकराणार आहेत. न्यायमूर्ती बोबडे हे महाराष्ट्रातील नागपूरचे सुपुत्र आहेत. त्यांचे आजोबा अॅड. श्रीनीवास बोबडे त्या काळातील ख्यातनाम वकील होते. वडील ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद बोबडे हे राज्याचे दोनदा महाधिवक्ता होते. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी 1978 मध्ये बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र अंतर्गत काम सुरु केले. 1998 मध्ये वरिष्ठ वकील झाले. 2000 साली त्यांनी मुंबई हाय कोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम पाहिले. मध्य प्रदेश हाय कोर्टात ते मुख्य न्यायाधीश झाले. तर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले.

3) न्यायमूर्ती धनंजय यशंवत चंद्रचूड
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 13 मे 2016 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले. या आगोदर न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी अलाहाबाद हाय कोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. मुंबई हाय कोर्टात देखील न्यायमूर्ती होते. न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होण्याअगोदर चंद्रचूड यांनी देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी सबरीमाला, भीमा कोरेगाव, समलैंगिकता यासारख्या महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी केली आहे.

4) न्यायमूर्ती अशोक भूषण
न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जैनपुर या ठिकाणी झाला. त्यांनी 1979 मध्ये युपी बार काउंसिल अंतर्गत काम सुरु केले. त्यानंतर अलाहाबाद हाय कोर्टात वकिलीची प्रॅक्टीस सुरु केली. ते 2001 मध्ये अलाहाबाद हाय कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले. 2014 मध्ये केरळ हाय कोर्टात न्यायमूर्ती पदाचा कार्यभार स्विकारला. तर 2015 साली ते केरळ हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले. 13 मे 2016 ला सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली.

5) न्यायमूर्ती अब्दुल नजीर
न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांनी 1983 साली वकीलीची प्रॅक्टीस सुरु केली. कर्नाटक हायकोर्टात प्रॅक्टीस करताना तिथेच त्यांनी अतिरिक्त न्यायाधीश आणि नंतर कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. 17 फेब्रुवारी 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 5 सदस्यीय खंडपीठाने एकमताने आजचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

Visit : Policenama.com