आयुर्वेदासह आधुनिक वैद्यकशास्त्राने एकत्रित संशोधन करावे – राज्यपाल

पोलिसनामा ऑनलाईन – आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र या दोघांचीही स्वतंत्र बलस्थाने आहेत. या शाखांनी एकत्रितपणे संशोधन कार्य केल्यास कर्करुग्णांना तसेच इतर रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. कोरोना संसर्गावरही आयुर्वेदाच्या माध्यमातून संशोधन होऊन उपचार शोधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने तयार केलेल्या आयुर्वेदिक ‘किमो रिकव्हरी किट’चे राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथून लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय संशोधन कार्य हे सखोल व सातत्यपूर्ण झाले पाहिजे. आयुर्वेदातील संशोधन जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्याचे पेटंट घेतले पाहिजेत. आयुर्वेदिक औषधांच्या प्रसारासाठी केवळ प्रचारावर भर न देता संशोधनावरही भर दिला पाहिजे. भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टतर्फे कर्करोग उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांचे 7 पेटंट दाखल केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदनही राज्यपालांनी केले. संस्थेच्या संशोधन कार्याशी टाटा ट्रस्ट जोडले असल्यामुळे त्यास विश्वसनीयता लाभली आहे, असे राज्यपालांनी सांगितले. किमो रिकव्हरी कीटमधील आयुर्वेदिक औषधांमुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.