ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात ते आनंदवन, कोण होत्या डॉ. शीतल आमटे ?

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी (Of the Leprosy Services Committee at Warora CEO Dr. Sheetal Amte-Karjagi) यांनी सोमवारी (दि. 30) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.

डॉ. शीतल आमटे या विकास आणि भारती आमटे यांच्या कन्या होत्या. 2003 मध्ये नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शीतल आमटे यांनी कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा जोपासण्यासाठी आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्यांनी महारोगी सेवा समितीची सर्व सूत्रं आपल्या हाती घेतले होते. डॉ. शीतल एक उत्तम फोटोग्राफरसुद्धा होत्या. जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचद्वारे ‘यंग ग्लोबल लीडर 2016’ साठी त्यांची निवड झाली होती. एप्रिल 2016 मध्ये संयुक्त राष्ट्राकडूनही नवोदित राजदूत म्हणूनही शीतल आमटे यांची निवड केली होती.

कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी
मध्यंतरीच्या काळात शीतल आमटे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ लाईव्ह करून आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल आणि संस्थेतील विश्वस्तांबद्दल नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, दोन तासांनंतर त्यांचा फेसबुकवरील हा व्हिडिओ डिलीट केला होता. त्यांच्या या व्हिडिओमुळे आमटे कुटुंबातील वादावर चर्चा रंगली होती. परंतु, आमटे कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावले होते. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली.