मराठवाड्यातील दुर्देवी घटना ! आधी 5 बहिणी बुडाल्या त्यानंतर 4 भाऊ बुडाले, एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू

भोकरदन/ जालना : पोलीसनामा ऑनलाइन – भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडी येथील पाझर तलावाजवळ खेळत असलेल्या पाच मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.23) सायंकाळी उघडकीस आली. मृत्यूमुखी पडलेल्या पाचही मुली एकाच घरातील असून 5 ते 7 वयोगटातील होत्या. ही घटना ताजी असतानाच श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे शेततळ्यात बूडून चार सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अरबाज सलीम शेख (वय-21), फैजल सलीम शेख (वय-19), दानेश सलीम शेख (वय-14), नवजीश सलीम शेख (वय-12) अशी चौघांची नाव आहेत. ही घटना मंगळवारी घडली असून शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबुर्डी यथील कैलास पोपट शिर्के यांच्या ऊसाच्या गुऱ्हाळाजवळ काही परप्रांतीय कुटुंब कामाला होते. बाबुर्डी शेजारी असणाऱ्या म्हातारपिंप्री गावतल्या दत्तत्रय विनायक शिर्के यांच्या हद्दीतील शेततळ्यात चौघे तरुण दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. शेततळे अर्धे भरलेले असल्याने पाणी खोल होते.

अगोदर तीन भाऊ पाण्यात पाईपला धरून उतरले, मात्र भार सहन न झाल्याने पाईप निसटला. तीन भाऊ पाण्यात पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी चौथा मोठा भाऊ पाण्यात उतरला. मात्र, त्यालाही पोहता येत नसल्याने आणि प्लास्टिक कागद निसरडा असल्याने त्यांना अंदाज आला नाही. तसेच पोहता येत नसल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी जाऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.