दोन लाखांची कर्जमाफी हे ‘बुजगावणं’, राज्यमंत्र्याचा सरकारला घरचा ‘आहेर’

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले. सरकारने कर्ज माफी केल्यानंतर विरोधकांनी यावर टीका केली असताना सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना किती लुटलं गेलं याचा हिशोब सरकारने दिला तर त्यांच्याकडेच शेतकऱ्यांचे पैसे निघतील. असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली. तुरीच्या आयत-निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं. हे नुकसान अगणित असून त्यांचा अंकात विचार ही करू शकत नाही. हे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांना दोन लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचे म्हणत आपल्याच सरकारला त्यांनी टोला लगावला आहे.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, कायद्यावर कायदे येत आहेत पण शेतकऱ्यांच्या हिताच्या कायदा मात्र हे केंद्र सरकार आणू शकत नाही. भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून म्हणताना हिंदुत्व सोडलं नसेल तर ते NRC चे समर्थन करतील, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना बच्चू कडूंनी राज्यातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरवण्याच सल्ला भाजपला दिला.