तर त्यांच्यापेक्षा मोठी गुंड होईल : संघमित्रा मौर्य

लखनौ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यासोबत कोणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला, तर घाबरु नका. संघमित्रा मौर्य त्याच्यापेक्षा मोठी गुंड होईल. असे वक्तव्य भाजपाच्या बदायूमधील उमेदवार संघमित्रा मौर्य यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, बदायूमधील उमेदवार संघमित्रा मौर्य यांनी प्रचारादरम्यान एका सभेत बोलतांना, ‘येत्या निवडणुकीत गुंडगिरी करणाऱ्यांना घाबरु नका. कोणीही तुमच्या मान, सन्मान, स्वाभिमानाला धक्का लावला, तर संघमित्रा मौर्य त्यांच्यापेक्षाही मोठी गुंड होईल. इतकेच नव्हे तर, ‘जनतेला आता कोणत्याही गुंडांना घाबरण्याची गरज नाही. कारण मी गुंडांपेक्षा मोठी गुंड झाले आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, जनसभेला संबोधित करताना मौर्य यांनी सपा-बसपा आघाडीसह काँग्रेसवर हल्लाबोल केला. जेव्हा मी मैनपुरीमधून मैदानात उतरले, तेव्हा मुलायम सिंह यादव यांना आझमगढमधून निवडणूक लढवावी लागली होती. असेही त्यांनी म्हंटले होते. विशेष म्हणजे, बदायूमधील भाजपच्या उमेदवार संघमित्रा मौर्य या भाजपाचे वरिष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कन्या आहेत. स्वामी प्रसाद मौर्य योगी आदित्यनाथांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.