गडचिंचले हत्या प्रकरण : 47 आरोपींना जामीन मंजूर, आत्तापर्यंत यातील 105 जणांना मिळालाय जामीन

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – गडचिंचले साधू हत्या प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर झालाय. ठाणे न्यायालयाकडून या 47 आरोपींना हा जामीन मिळाला असून काही दिवसांपूर्वी ठाणे न्यायालयाने याच प्रकरणातील 58 जणांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये 105 जणांना जामीन मिळालाय.

साधूंच्या हत्येप्रकरणी एकूण 228 आरोपीना पोलिसांनी अटक केली होती. ज्यात 12 आरोपींचे वय 18 वर्षाखालील होते. या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सीआयडीने डहाणू न्यायालयात 11 हजार पानांचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते.

पालघर साधू हत्या प्रकरणामध्ये कोणतेही जातीय कारण नसून काही अफवा असल्याचा दावा सीआयडीने आपल्या तपासणीमध्ये केलाय. यात आतापर्यंत 228 जणांना अटक केली होती. तर, हत्येप्रकरणी 808 संशयितांची चौकशी केली गेली आहे.

जाणून घ्या, काय आहे गडचिंचले प्रकरण?
16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू आणि वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला होता. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातमार्फत केला. या प्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचार्‍यांचे निलंबन तसेच 35 कर्मचार्‍यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली केलीय.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गडचिंचले हत्याकांड प्रकरणामध्ये कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयामध्ये दाखल केले आहेत.