बाळासाहेबांच्या नावाच्या विमा योजनेला भाजपने दाखवला कात्रजचा घाट

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – शिवसेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मोठा गाजावाजा करत दोन वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची घोषणा केली होती. मात्र अजूनही ही योजना अस्तित्वात आलेली नाही. शिवसेनेला या योजनेचा लाभ होऊ नये म्हणून भाजपनेच हा मोडता घालत योजनेला कात्रजचा घाट दाखविल्याची चर्चा सुरू आहे.

राज्यातील कोणत्याही रस्त्यावर कोणालाही अपघात झाल्यास बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेअंतर्गत ७२ तास मोफत औषधोपचार किंवा ३० हजार रुपये देण्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे या योजनेला मंजुरी मिळाली नसल्याने एका पैशाचीही तरतूद या योजनेसाठी केली जाणार नाही, असे वित्त विभागाने आरोग्य खात्याला कळविल्याचे समजते. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी २०१५ च्या अखेरीस बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची घोषणा केली. यानंतर या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यताही घेण्यात आली. गेल्या वर्षी राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातही या योजनेचा उल्लेख केला. मात्र आजपर्यंत आरोग्य विभाग या योजनेची अंमलबजावणी करू शकलेला नाही.

राज्यात शिवसेना सत्तेमध्ये सामील झाल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या अनेक योजनांच्या घोषणा शिवसेनेच्या मंत्र्यांनी केल्या. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनीही रस्त्यावरील अपघातांची मोठी संख्या लक्षात घेऊन जखमी रुग्णांना तात्काळ मदत मिळावी यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील रस्त्यावर रोज शेकडो अपघात होतात व यातील अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पहिल्या टप्प्यात योजनेचा अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूदही प्रस्तावित केली होती. मात्र या योजनेला अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नसल्याचे सांगत वित्त विभागाने एक रुपयाचीही तरतूद अर्थसंकल्पात केली नाही.

या योजनेसाठी आरोग्य विभागाने ठोस पाठपुरवा करून दोन वर्षांपूर्वीच ही योजना लागू केली असती तर महाराष्ट्रातील अपघातांमध्ये गंभीर जखमी होणाऱ्या शेकडो रुग्णांना वेळेवर मदत मिळून त्यांचे जीव वाचले असते, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.