‘5 वर्ष सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवल नाही का ?, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचे एका दगडात 2 पक्षी !

पोलीसनामा ऑनलाईनः गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असूनही औरंगाबाद नामांतरावर गप्प असणारा भाजप आज त्यावर राजकारण करत आहे. ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून पाहते, अशी शेलक्या शब्दात राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. तसेच शिवसेनेला मतांची चिंता असल्यानेच औरंगाबाद नामांतरावरुन त्यांचा ‘सामना सुरु असल्याचा टोला थोरात यांनी लगावला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन ‘सामना’मधून केलेल्या शिवसेनेच्या टीकेला थोरातांनी ‘रोखठोक’ प्रत्युत्तर दिले आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक ट्विट केले आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन राज्याच्या राजकारणात धुरळा उडत आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, मागील 5 वर्ष एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाहीतर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा आठवला नाही का? असे थोरातांनी पत्रक काढून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

आमचे सरकार स्थिर, कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाहीः भाजपला टोमणा
नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याच्या भाजपच्य टीकेलाही थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. थोरात यांनी यावेळी शिवसेनेला टोला लगावला असला तरी सरकार स्थिर असल्याचंही आवर्जुन स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही, असे थोरात यांनी म्हटले आहे.