‘आमचे काही लोक तुमच्याकडे येणार हे सांगण्यासाठी भेटलो अन् तसंच घडलं’ थोरातांचा विखेंना ‘टोला’

संगमनेर (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दोन वर्षांपूर्वी भाजपाच्या संपर्कात होते असा धक्कादायक गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. यावर थोरातांनी टोला लगावला असून ते म्हणाले, ‘आमचे काही लोक तुमच्याकडे येणार आहेत हे सांगण्यासाठी भेटलो आणि तसेच घडले.’

तसेच बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘अशा वक्तव्यांना महत्व देण्याची काही गरज नाही. कारण राज्यात सत्ता बदलली आहे, त्यामुळे आता कोण कोण बदलेल हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असावी.’ असा टोला त्यांनी शनिवारी संगमनेर येथे बोलताना लगावला. जिल्ह्यात आतापर्यंत जी काही आव्हाने आली त्यास सामोरे जाऊन काँग्रेसच्या विचारसरणीने आजपर्यंत काम करत आलो आणि यापुढेही करत राहणार असे ही त्यांनी स्पष्ट केले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते की, काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या माझ्या बाबतच्या चर्चा या निरर्थक असून हे फक्त बदनाम करण्याचे कारस्थान आहे असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही आमच्या सुख दु:खाची चिंता करणारे मंत्री बाळासाहेब थोरात हेच दोन वर्षापूर्वी भाजपामध्ये प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यासंदर्भात त्यांनी दिल्लीत जाऊन कोणाकोणाच्या भेटी घेतल्या हे आता जाहीर करण्याची वेळ आणू नका असाही इशारा त्यांनी दिला.

दरम्यान थोरातांवर टिका करताना विखे पाटील म्हणाले, थोरातांना सर्व काही अपघाताने मिळाले आहे, पक्षाला मिळालेल्या यशात त्यांचा शून्य वाटा आहे. मागील साडेचार वर्षात थोरात हे कुठेच दिसत नव्हते असा आरोप त्यांनी केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/