पानिपत लढाईनंतरच्या वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठ्यांच्या इतिहासातील मोठी जखम म्हणजे पानिपतचा पराभव, त्या पराभवानंतर आपल्या मावळ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावे लागले. त्या गुलामांच्या जीवनावर आधारित ‘बलोच’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पानिपतच्या लढाईनंतरचं सत्य या चित्रपटातून दाखवण्यात येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

पानिपतची लढाई साऱ्यांच्याच स्मरणात आहे. मात्र, या लढाईनंतरची परिस्थिती कशी होती याचा उलगडा लवकरच होणार आहे. प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच’ या चित्रपटात पानिपतच्या लढाईनंतरच्या वास्तवावर भाष्य करण्यात येणार आहे. पानिपतच्या युद्धातल्या विजयानंतर अहमदशाह अब्दालीनं तब्बल २२ हजार मराठा युद्ध कैद्यांना आपल्यासोबत अफगाणिस्तानला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पानिपतच्या युद्धाच्या २ महिन्यांनंतर म्हणजेच २० मार्च १७६१ रोजी अहमदशाह अब्दालीनं दिल्लीहून अफगाणिस्तानच्या दिशेने कूच केली. सोबत होते २२ हजार युद्धकैदी. पाकिस्तानातला पंजाब प्रांत पार केल्यानंतर बलुचिस्तानातलं डेरा बुगती हे क्षेत्र सुरु होतं. याच ठिकाणी अहमदशाह अब्दाली युद्धकैद्यांसोबत पोहोचला. पानिपतच्या युद्धामध्ये बलुची शासकाचे काही सैनिक अब्दालीच्या बाजूनं लढले होते. त्यामुळे अब्दालीला त्या मदतीच्या मोबदला द्यायचा होता. अब्दालीनं सारे मराठी युद्धकैदी बलुचिस्तानच्या शासकाला भेटस्वरुपात दिली, जे अखेरपर्यंत तिथेच राहिले.

या चित्रपटामध्ये अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हेदेखील स्क्रीन शेअर करणार असून प्रवीण तरडे आणि भाऊराव कऱ्हाडे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.