‘कोरोना’मुळे समुद्रात गणेश विसर्जनावर बंदी घाला, डॉक्टरांनी केली मागणी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होऊ नये, यासाठी समुद्रात गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी मुंबईतील नामवंत डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. घरगुती किंवा सार्वजनिक गणशोत्सवातील गणपती मूर्तीचे फक्त कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. पद्मभूषण डॉ. एन.ए. लाड, पद्मभूषण डॉ. आर.डी. लेले, डा. रविन थत्ते, डॉ. शैला व्ही. पालेकर व डॉ. सुनील जी. दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका संभवतो, त्याला प्रतिबंध करण्यासाठी, संबंधित यंत्रणेला मदत होईल, अशा काही विधायक सूचना केल्या आहेत. राज्य शासनाने व मुंबई महापालिका प्रशासनाने लोकांना खबरदारी घेऊन, गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे, परंतु त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील वर्षी मुंबईतील 2 लाख 30 हजार गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 1 लाख 98 हजार मूर्तीचे समुद्रात आणि 33 हजार मूर्तीचे महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यानुसार समुद्रावर, तलावांवर विसर्जनासाठी गर्दी होणार आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होऊ शकेल. त्याचा वैद्यकीय पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडेल. मुंबईकर व कोरोना योद्धा म्हणून लढणारे डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन, समुद्रात व तलावांमध्ये गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी घालावी, अशी विनंती डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.