मुंबई : वांद्रे झोपडपट्टीतील आग अखेर नियंत्रणात

मुंबई : झोपडपट्टी आग आॅनलाईन – मुंबईतील झोपडपट्टीला लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. वांद्रे पश्चिममधल्या नागरदास रोडजवळच्या निर्मल झोपडपट्टीतील ही घटना आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असुन, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतकेच नाही तर 60 ते 70 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली होती. लेव्हल 4 ची आग असल्याने अग्निशमन दलाच्या सुमारे 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या इथे कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. निर्मल झोपडपट्टीत आज सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास ही भीषण आग लागली होती.

कशी पसरली आग ?

या परिसरातील झोपड्या या लाकडी आणि बांबूच्या असल्याने आग वेगाने पसरली. या झोपडपट्टीला लागूनच फर्निचरची दुकानं आहेत. शिवाय जवळच लकी हॉटेल आणि मशिदही आहे. त्यामुळे तिथे आग पसरु नये याची काळजी घेतली जात होती. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. विशेष म्हणजे या झोपडपट्टीत अनेक लहान उद्योग चालवले जातात. निर्मल झोपडपट्टीमध्ये हजारो लोक राहतात. आगीत 60 ते 70 झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीही इथे आगीची घटना घडली होती.

कसे मिळवले आगीवर नियंत्रण ?

अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे  स्थानिकही आपापल्या परीने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. झोपडपट्टीत असणाऱ्या अतिशय अरुंद आणि चिंचोळ्या गल्ल्या असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या.

महाडेश्वरांची प्रतिक्रिया-

दरम्यान, अनधिकृत बांधकामांना पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. तसंच आग नेमकी कशामुळे लागली की लावली गेली, याचीही चौकशी होईल, असं महाडेश्वर म्हणाले.